पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य दिनानिमित्त आज (दि.१५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात राष्ट्रध्वज फडकावला आणि उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी ग्वाही दिली की, " शेतकरी, युवक, कामगार, महिला भगिनी सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यास शासन कटिबद्ध आहे"
सर्वत्र ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१५) मंत्रालयात राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी उपस्थितांना संबोधित केले. " बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.., गेल्या दोन वर्षात राज्याने चौफेर प्रगती केली आहे. विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल घटकांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रति असलेली बांधिलकी दाखवून दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ५ ट्रीलियन डॉलर्स बनवून जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरू आहे. त्यात आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे. "
पुढे बोलताना ते म्हणाले, " नुकतीच राज्याने लॉजीस्टिक धोरण तयार केले असून त्या माध्यमातून ३० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात राज्याचा वाटा १४ टक्के असून, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. यंदा पाऊस उत्तम झाला असून पीके चांगली येणार अशी आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी, युवक, कामगार, महिला भगिनी सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यास शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली."
यावेळी राज्य प्रशासनातील सर्व प्रधान सचिव तसेच महत्वाचे अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.