कुर्ला, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उपनगरात गुरुवारी (दि २५) सकाळपासून जोरदार पाऊस झाला. ज्यामुळे विहार तलाव आणि पवई तलाव ओव्हर फ्लो झाले. यामुळे मिठी नदी धोका पातळीजवळ पोहचली. मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या रहिवाशी वस्तींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पालिका कर्मचा-यांकडूअ लाउड स्पीकरद्वारे घोषणा करण्यात येत होती आणि सातत्याने सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या जात होत्या.
मिठी नदी २.७ मीटर पातळी गाठते तेव्हा धोकादायक पातळी घोषित केली जाते. गुरुवारी दुपारी ही पातळी २.६ मीटर एवढी झाली होती. त्यामुळे पालिका सतर्क झाली. पालिका सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर या ठिकाणी ठाण मांडून होते. पालिकेची विविध पथके तैनात करण्यात आली. दुपारी समुद्राची भरती होती, त्यात पाऊस जोरात झाल्यास मिठी नदी धोकादायक पातळीवरून वाहू लागली असती आणि आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असते. मात्र गुरुवारी दुपारी पावसाचा जोर ओसरला आणि पाणी पातळी कमी होत गेली. मात्र या ठिकाणी पालिकेची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.