नवी मुंबई : नवी मुंबई एमआयडीसीमधील मुख्य रस्त्यालगत असणार्या यादवनगर येथील एका प्लास्टिकच्या बेकायदेशीर गोदामाला बुधवारी दुपारी 2.30च्या सुमारास आग लागली. या गोदामाला आग लागल्यानंतर त्याच्यालगत असणार्या बाजुच्या गोदामालाही आग लागण्याचा प्रकार घडला. चार ते पाच सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. सुदैवाने यावेळी कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पण वीत्तहानी मात्र झाली आहे. या भंगारांच्या दुकानांची आग विझवण्यासाठी नवी मुंबई अग्निशामन दलाच्या ऐरोली, नेरुळ, बेलापूर, सीबीडी येथून दहापेक्षा आधिक गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या. सायंकाळी उशीरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे भंगाराच्या बेकायदेशीर दुकानांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
एमआयडीसीतील रबालेपासून यादवनगरपर्यंतच्या अंतर्गत रस्त्यावर बेकायदेशीर भंगारची गोदामे थाटण्यात आली आहेत. या बेकायदेशीर गोदामांमध्ये एमआयडीसीतील बंद पडलेल्या कंपन्यांमधील भंगार आणून विकले जाते. येथे चोरीच्या वस्तूंसह लोखंडाचे सामान विकले जाते. लाखो रुपयांची या भंगाराच्या दुकानांतून उलाढाल होत असते. मात्र यामध्ये शासकीय यंत्रणांचेही हात ओले होत असल्याने या भंगाराच्या दुकानांकडे प्रशासन कानाडोळा करत आहे.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी येथील भंगार चोरांनी ऐरोली येथील महावितरण वसाहतीत घुसून भंगार चोरीचा प्रयत्न केला असताना गोपाळ सैदाणे या पोलीस हवालदाराची हत्या झाली होती. दिघा येथील अंब्रेको या कंपनीमधील सुरक्षा रक्षकाचीही भंगारचोरांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र या भंगारमाफियांकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे त्यांचे चांगलेच फावले आहे. या भंगार दुकानांवर एमआयडीसीकडून कारवाई करण्यात येते मात्र हे भांगरमाफिया पुन्हा त्याच ठिकाणी आपले बस्तान मांडत आहे. या भंगाराच्या दुकानांनी एमआयडीसीमधील भूखंड गिळंकृत करण्याचाही प्रयत्न केला आहे. एमआयडीसीमधील एकात्मिक रस्ते प्रकाल्पांतर्गत रस्त्यांचे काम सुरू असताना रस्ता रुंदीकरणात अनेक भंगाराची दुकाने हटवण्यात आली होती. मात्र या भंगारमाफियांनी पुन्हा रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. या भंगाराच्या दुकानांमध्ये कंपन्यांमधील चोरीचा माल आणून विकला जातो. अनेकदा पोलीसांनीही चोरीचा माल हा या भंगाराच्या दुकानांतून हस्तगत केला आहे. मात्र प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे या भंगार दुकानादांराचे चांगलेच फावले आहे.