पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील काही भागांत मुसळधार (Weather Updates) पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागाने (IMD) कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि गोव्यात (Goa) आज शनिवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. गेल्या २४ तासांत गोवा आणि कोकणात मुसळधार ते अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये सर्वाधिक २१ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईतही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट क्षेत्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.
आज कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकतो. त्यानंतर ४-५ दिवसांत पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
चिलीका सरोवराजवळील ओडिशाच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिमकडे सरकला आहे. तो आज त्याच प्रदेशावर पुरीच्या सुमारे पुरी (ओडिशा) च्या पश्चिम-नैऋत्येस ५० किमीवर आणि गोपाळपूर (ओडिशा) च्या ईशान्येस ७० किमीवर स्थिरावला आहे. तो ओडिशा आणि छत्तीसगडच्या वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि पुढील १२ तासांत तो हळूहळू कमी दाब क्षेत्रात कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
ओडिशा किनाऱ्यावरील मान्सूनच्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे (Depression) आज २० जुलै रोजी विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये अतिवृष्टी पावसाची शक्यता आहे. तर ओडिशाचा दक्षिण भाग, आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील ४-५ दिवसांत गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ३५.५ फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, रुकडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकूड, बाचणी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.