मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक उपदेश देणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत.
सगळा त्याग जनतेने करायचा का ? प्रचारमंत्री नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी पंतप्रधानपदाचा ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन करत होते तेव्हा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुकांमध्ये मग्न होते. देशात इंधन आणि एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.
आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र 40-50 गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही, असे सपकाळ म्हणाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता. सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटाच्या खाईत ढकलले आहे, असे ते म्हणाले.
आधी स्वतः काटकसर करा: अंजली दमानिया
काटकसरीचा पंतप्रधान आणि त्यांच्या भाजपने आधी याचा विचार करावा, असे सांगत स्वतः मोदी एका दिवसांत हैदराबाद, बंगळुरू आणि गुजरात राज्याचे दौरे केले. चार्टर विमानाने गेले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी रॅली घेतल्या.
त्यांच्यासोबत 40-50 गाड्यांचा ताफा असतो. त्यामुळे स्वतः कोट्यवधी रुपयांचा खर्च करायचा आणि सामान्य जनतेला सल्ले द्यायचे हे योग्य नाही, असा संताप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.