Harshvardhan Sapkal Pudhari Photo
मुंबई

Political News: मुंबईतील तब्बल १२ हजार १८१ कंपन्या बंद पडल्या; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

सपकाळ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राज्यातील ३५ हजार २११ खासगी कंपन्या बंद पडल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुतंवणूक आणि त्यातून लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचा भाजपा महायुती सरकारचा दावा खोटा आहे. सरकारचे दावे हे कागदावरच असून भ्रष्टाचार, कमिशनखोरी आणि गुंडगिरीमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद पडत असून ते परराज्यात स्थलांतर करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

सपकाळ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राज्यातील ३५ हजार २११ खासगी कंपन्या बंद पडल्या आहेत. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील १२ हजार १८१ कंपन्यांचा समावेश आहे,हे अत्यंत धक्कादायक आहे.

भाजपा महायुती सरकारचे धोरण उद्योगधंद्यांना पोषक नाही. महाराष्ट्रातील किती उद्योग बंद पडले, ही माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे. मुंबई–पुणे–नाशिक पट्ट्यातील कंपन्या बंद होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पुढे आले आहे.

सरकारचे आकडेच सरकारची पोलखोल करत आहेत, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र हे मान्य करताना दिसत नाहीत, अशी टीका सपकाळ यांनी केली.

शब्दच्छल करून असे झालेले नाही, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. बंद पडलेल्या या कंपन्या डिफंक्ट कंपन्या आहेत असा फडणवीस यांचा दावा आहे, पण कंपन्या बंद पडल्या, हे सत्य त्यामुळे लपवता येत नाही, असे सपकाळ म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT