नवी मुंबई: मटारचा मुख्य हंगाम संपला असल्याने, वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मटारची आवक कमी झाली आहे. परिणामी मटारचे दर वाढले आहेत. हिरवा मटार घाऊक बाजारात 50-60 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात तो 100 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
मटारला मुंबईत वर्षभर मोठी मागणी असते. घरगुती वापराबरोबरच हॉटेल व्यावसायिकांकडून मटार मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. पावसाळा आणि हिवाळा हा मटारचा मुख्य हंगाम आहे. या मुख्य हंगामात मटारच्या 40 ते 50 गाड्या दररोज वाशीच्या घाऊक बाजारात दाखल होत असतात. मात्र आता मटारचा हंगाम नसल्याने बाजारात त्याची आवक कमी झाली आहे.
सध्या महाराष्ट्रातील मटारचा हंगाम संपला असल्याने मुंबईच्या घाऊक बाजारात दिल्ली, हिमाचल प्रदेशमधून हिरव्या मटारची काही प्रमाणात आवक होत आहे. हा मटार बाजारात यायला वाहतूक खर्च अधिक होत असल्याने मटारचे दर वाढलेले आहेत. आत्ता हंगाम नसल्याने बाजारात मटारच्या आठ ते दहा गाड्या येत आहेत.
त्यामुळे बाजारात एकूणच आवक रोडावलेली असल्याने मटारचे दर वाढलेले आहेत. घाऊक बाजारात मटार 50-60 रुपये किलोने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात हे दर 100 रुपये प्रतिकिलो आहेत. आता मटारची आवक कमी असल्याने हे दर वाढलेले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे