मुंबई: गिरगावातील नागरिक वीज, पाणी समस्येने रडकुंडीला आले आहेत. मागील आठवडाभर वीजेचा लपंडाव सहन केल्यानंतर बुधवारी सकाळी नळाला एक थेंबही पाणी आले नाही. पाण्याविना त्यांचे प्रचंड हाल झाले. गेली पंधरा दिवस पाण्याची ही समस्या आहे. त्यामुळे पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशाराच गिरगावकरांनी मुंबई महापालिकेला दिला आहे.
आठवडाभर गिरगावकरांनी विजेचा लपंडाव सहन केला. तापमानाचा पारा चाळीशीत असताना वीजपुरवठा खंडित होत होता. याची बेस्ट प्रशासन दखल घेत नसल्यामुळे जीटी रुग्णालयासमोरील फाटकवाडी कार्यालयावर गिरगावकरांनी हल्लाबोल केला. नागरिकांचा रोष पाहून लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यानंतर वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तोच पाणी समस्येने डोकेवर काढले आहे.
बुधवार पहाटे गिरगावातील अनेक वाड्यांमध्ये पाणी आलेच नाही. अचानक पाणी न आल्याने नोकरदार वर्गाची मोठी पंचायत झाली. पूर्व कल्पना नसल्याने पाणीसाठा केला नसल्याने आता करायचे काय हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अंघोळ न करताच अनेकांनी ऑफीस गाठले. भर उन्हाळ्यात घरात थेंबरही पाणी नसल्यामुळे गिरगावकरांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या समस्येबाबत पालिकेच्या
डी विभागाचे जलअभियंता संदेश खेडकर यांना विचारणा केली असता, नियमीत पाणी सोडले असल्याचे त्यांनी सांगितले. दहा टक्के कपातीमुळे पाणी काही ठिकाणी आले नसेल असे मत व्यक्त केल्याने नागरिक संतप्त झाले होते.
गिरगावची अवस्था खेडेगावासारखी
मुंबई पालिकेच्या डी विभागात गिरगाव व मलबार हिल हे दोन परिसर येतात. मलबार हिलमध्ये कधी वीज, पाणी समस्या निर्माण झाल्याचे ऐकीवात नाही. मात्र गिरगावात रस्त, पदपथ, वीज, पाणी ह्या समस्या कायम आहेत. त्यामुळे आमची अवस्था मुंबईत असून एखाद्या खेडेगावासारखी झाल्याची भावना समाजमाध्यमांवर गिरगावकर व्यक्त करीत आहेत.
गिरगावात वीजबिघाड दुरुस्ती वाहन तैनात करणार
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने हैराण झालेल्या गिरगावकरांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बेस्टच्या वीज अधिकाऱ्यांनी बुधवारी गिरगावात पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित आणि वीजपुरवठा विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक आणि मुख्य अभियंता सहभागी होते.
पाहणी केल्यानंतर त्यांनी रहिवाशांशी चर्चा करीत त्यांचे म्हणणे एकूण घेतले. गिरगावात अभियंता, तंत्रज्ञ कामगार असे सुसज्ज अतिरिक्त वीजबिघाड दुरुस्ती वाहन तैनात करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. त्याचप्रमाणे वीज विभागात अधिक मनुष्यबळाची व्यवस्था करून प्रलंबित असलेल्या केबल फॉल्टसची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सूचना बेस्टच्या संबंधित अधिकारांना त्यांनी दिल्या.
बिल्डरांनी पाणी चोरले?
गिरगावात ज्या जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्यामधून बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदेशीर मार्गाने पाणीजोड दिल्याचा आरोप गिरगावकरांचा आहे. जल अभियंत्यांना हाताशी धरून गिरगावकरांच्या हक्काचे पाणी बिल्डरांना विकल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मुंबईला शांघाय बनवण्याच्या बाता मारणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला दक्षिण मुंबईतील गिरगाव भागात गेल्या 15 दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही देता आलेला नाही. हा गिरगावकरांचा छळ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकर लॉबीच्या दावणीला बांधले जात आहे. गिरगावचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर गिरगावकर आता शांत बसणार नाहीत. पालिका अधिकाऱ्यांना वॉर्ड ऑफिसमधून बाहेर पडू देणार नाही.- विक्रांत भालेराव, गिरगावकर नागरिक
या विभागात स्पष्टपणे दुजाभाव केला जात आहे. वाळकेश्वर किंवा परिसरातील मोठ्या टोलेजंग इमारतींना आणि टॉवर्सना कोणत्याही अडचणीशिवाय अखंड वीज व पाणीपुरवठा होतो, मात्र चाळींमधील रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाई आणि अघोषित वीज कपातीला सामोरे जावे लागत आहे. रहिवाशांना हद्दपार करण्याचा ‘राजकीय कट’ आहे की काय?- वंदना मिथुन रोकडे, अध्यक्षा, कनिष्का महिला बचत गट