घाटकोपर: परिवहन विभागाकडून राज्यातील रिक्षा व टॅक्सीचालकांना व्यवहारिक मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून रिक्षा व टॅक्सीचालकांची मराठी भाषेची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र, शासनाच्या या नियमांना विरोध करत काही अमराठी रिक्षाचालक रस्त्यावर उतरल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
कांदिवली परिसरात काही रिक्षाचालकांनी रस्त्यावर वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. तर कांदिवली पश्चिम येथे एका मराठी रिक्षाचालकाला चार ते पाच अमराठी रिक्षाचालकांनी अडवून धमकावण्याचा तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
त्यामुळे शासनाचा नियम न पाळणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांविरुद्ध असंतोष पसरत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या मुजोर अमराठी रिक्षाचालकांना इशारा देण्याकरीता घाटकोपरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव ॲड. अभिषेक सावंत यांनी स्टेशन रोड परिसरात बॅनर लावून परप्रांतीयांना महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला.
मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून हे बॅनर तात्काळ हटवण्यात आले महाराष्ट्र राज्यात नोकरी, व्यवसाय करायचा, मात्र मराठी भाषा बोलायची नाही आणि राज्य शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवायची, हे महाराष्ट्रातील मराठी माणूस सहन करणार नाही.
मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षाचालकांना पुरेसा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतरही काही अमराठी रिक्षाचालक भाषा शिकण्यास तयार नसतील आणि त्यातून मुजोरी दाखवत असतील, तर अशा व्यक्तींवर पोलिसांनी आणि संबंधित प्रशासनाने कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया ॲड. अभिषेक सावंत यांनी दिली.