मुंबई : मुंबई महापालिकेने काही अटी शर्तींवर मुंबई शहर व उपनगरात गरबा खेळण्यासाठी मंडळांना परवानगी दिली आहे. सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून काही निकष ठरवून दिले आहेत.
यात गरब्याच्या ठिकाणी डॉक्टरांसह रुग्णवाहिका असणे बंधनकारक आहे. याचे आयोजकांकडून पालन होते की नाही, याची मुंबई महानगरपालिकेकडून अचानक भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे.
मुंबईत सरासरी लहान मोठ्या 500 पेक्षा जास्त गरब्यांची संख्या आहे. त्याशिवाय सोसायटी व अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गरब्याचे आयोजन करण्यात येते. मोठ्या गरब्यांसाठी मुंबईकर तिकीट काढून हजेरी लावतात. अशा गरब्यांमध्ये हजारो नागरिक सहभागी होतात. रास दांडिया खेळत असताना अनेकजण भान विसरून नाचण्यामध्ये गुंग होतात. अशावेळी हृदयावर ताण येऊन, हृदयविकाराने मृत्यू होण्याची भीती असते. अशा घटना मागील दोन वर्षांत घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून व हृदयविकाराचा झटका येणार्या व्यक्तीला तातडीने उपचार मिळावा, यासाठी प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे मंडळांना सक्तीचे करण्यात आले आहे. तसे हमीपत्रही आयोजकांकडून घेण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षितेसाठी विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक व अन्य सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याचेही बंधनकारक केले आहे. पण याचे आयोजकांकडून पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची टीम यंदा गरब्याच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन, दिलेल्या निकषांचे पालन होते की नाही याची खातरजमा करणार आहे. अन्य सुरक्षांपेक्षा गरब्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका असणे बंधनकारक आहे. या रुग्णवाहिकेमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर व ऑक्सिजनची सुविधा असणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
गरबा आयोजकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते हा दंड 500 ते 10 हजारापर्यंत असू शकतो. त्यामुळे निकषाचे पालन करा असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.