अकरावीला अजूनही 1 लाख 93 हजार विद्यार्थी प्रवेशापासून दूरच  pudhari photo
मुंबई

11th admission : अकरावीला अजूनही 1 लाख 93 हजार विद्यार्थी प्रवेशापासून दूरच

26 ते 30 ऑगस्टदरम्यान शेवटची फेरी; ‘ओपन टू ऑल’ विशेष फेरीत 78 हजार 657 विद्यार्थ्यांचे प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या ‘ओपन टू ऑल’ विशेष फेरीअंतर्गत प्रवेशाची संधी मिळालेल्या 85 हजार 101 विद्यार्थ्यांपैकी 78 हजार 657 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे राज्यभरामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12 लाख 78 हजार 44 इतकी झाली आहे. मात्र नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 93 हजार 703 विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून दूरच आहेत. प्रवेशापासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता अखेरची प्रवेश फेरी 26 ते 30 ऑगस्ट या काळात होणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार फेर्‍या त्यानंतर ओपन टू ऑल फेरीअंतर्गत दोन फेर्‍या राबविण्यात आल्या. अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या 14 लाख 71 हजार 747 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 78 हजार 44 विद्यार्थ्यांनी या फेर्‍यांमधून प्रवेश घेतले आहेत. यामध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक 2 लाख 85 हजार 400 विद्यार्थांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल पुणे विभागातून 2 लाख 25 हजार 461, छत्रपती संभाजी नगर विभागातून 1 लाख 58 हजार 189, नाशिक विभागातून 1 लाख 42 हजार 688, नागपूर विभागातून 1 लाख 32 हजार 241, कोल्हापूर विभागातून 1 लाख 29 हजार 486, अमरावती विभागातून 1 लाख 24 हजार 767 आणि लातूर विभागातून 79 हजार 454 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

ओपन टू ऑल फेरीच्या विशेष फेरीमध्ये 78 हजार 657 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये 74 हजार 440 विद्यार्थ्यांनी नियमित फेरीद्वारे तर 4 हजार 217 विद्यार्थ्यांनी कोट्याद्वारे प्रवेश निश्चित केल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली. रिक्त राहिलेल्या जागा 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर 26 आणि 27 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी तसेच प्राधान्यक्रम यादीत बदल करता येणार आहे. 29 ऑगस्ट रोजी अंतिम विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यामध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 29 आणि 30 ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे असेही त्यांनी नमूद केले.

अशी असेल अंतिम फेरी

  • 25 ऑगस्ट- रिक्त जागांची माहिती

  • 26 व 27 ऑगस्ट- नवीन नोंदणी व प्राधान्यक्रम बदल

  • 29 ऑगस्ट- अंतिम विशेष फेरीसाठी प्रवेश निवड यादी

  • 29 व 30 ऑगस्ट- विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा

मुंबई प्रवेशात टॉप

मुंबई विभागातून झालेल्या एकूण 2 लाख 85 हजार 400 विद्यार्थांच्या प्रवेशापैकी मुंबई शहर व उपनगरातून 1 लाख 27 हजार 534 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यातून 93 हजार 712, पालघर जिल्ह्यामधून 34 हजार 948 आणि रायगड जिल्ह्यातून 29 हजार 206 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरीमध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक 24 हजार 241 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT