मुंबई: राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम राबवत अवघ्या सहा दिवसांत 203 ठिकाणी कारवाया केल्या. 25 मे ते 31 मे या कालावधीत ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्यात आली.
या मोहिमेत 1 कोटी 58 लाख 28 हजार रुपयांचा प्रतिबंधित व भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून 102 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 68 आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत सुमारे 90 हजार किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 1.24 कोटी रुपयांहून अधिक आहे. संबंधित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोकण विभागात सर्वाधिक 46 आरोपींना अटक करण्यात आली, तर मुंबई विभागात 23 जणांना अटक झाली.
राज्यातील 73 आस्थापनांची तपासणी करून आंबे, बर्फी, लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट आणि मसाल्यांमधील भेसळीवर कारवाई करण्यात आली.
मोहिमेचे फलीत
203 ठिकाणी कारवाया
1.58 कोटींचा मुद्देमाल जप्त
102 आरोपी अटकेत
68 आस्थापना सील
73 आस्थापनांची तपासणी
90 हजार किलोहून अधिक अन्नसाठा जप्त
1.24 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त
“शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री किंवा उत्पादन आढळल्यास कठोर कारवाई अपरिहार्य असेल. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल.“-तुकाराम मुंढे, एफडीए आयुक्त