मुंबई: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर धडक मोहीम राबविली आहे.
११ आणि १२ जून रोजी झालेल्या कारवाईत ३५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ३ कोटी ४८ लाख ३७ हजार २३२ रुपये किमतीचा १ लाख ९२ हजार ८२९.९३ किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला.
‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागांत छापे टाकण्यात आले. सुपारी, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तूप, गूळ तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवर कारवाई करण्यात आली. जप्त अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
या कारवाईत नागपूर विभागातून सर्वाधिक २ कोटी २१ लाख १५ हजार १२५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्याखालोखाल पुणे विभागात ६८ लाख ८९ हजार ६०५ रुपये, तर कोकण विभागात ३१ लाख ५३ हजार ४१० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
तक्रार कुठे कराल?
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी एफओएससीओएस पोर्टल, फूड सेफ्टी कनेक्ट ॲप किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे.