मुंबई: आरोग्य क्षेत्राला कमी प्राधान्याचे क्षेत्र समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि चांगले ब्रँडिंग असावे. सरकारी दवाखाने म्हणजे अस्वच्छ किंवा निकृष्ट ही नागरिकांची धारणा बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनाला दिल्या.
प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या पाठपुराव्यासाठी स्थापित मुख्यमंत्री वॉररूमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
आरोग्य व्यवस्थेसाठीच्या राज्याच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. केंद्र सरकारकडून येणारा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारणे, क्रिटिकल केअर ब्लॉक व एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांची कामे वेगाने करण्यासाठी लक्ष घालावे, असेही ते म्हणाले.
पुणे पॅटर्न राबवा
पुण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सकारात्मक बदलाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, अशा चांगल्या उपक्रमांचा इतर ठिकाणीही अवलंब व्हायला हवा. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारून लक्ष घालावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीमधील अडचणी तातडीने दूर करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या मुदतींची नोंद करण्यात आली आहे.
पुढील वॉररूम बैठकीत त्याचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी सर्व्हायकल कर्करोग प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राला जवळपास दहा लाख मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते पूर्ण करा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
आयुष्मान आरोग्य मंदिर
आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना गती देण्यात येत असून, या यंत्रणा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (पीएचसी) उन्नतीकरणामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणार असल्याचे ते म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकष अडचणीचे
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषांमुळे काही ठिकाणी रुग्णालय उभारणीस अडचणी येत असल्याचे सांगितले. काही प्रकल्प पूर्णत्वास आले असले तरी पिण्याचे पाणी, रस्ते यांसारख्या सुविधा अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील 55 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आल्याचे सांगितले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची व्याप्ती प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सक्षमपणे वाढविली तर नागरिकांना चांगली सेवा देता येईल, असे स्पष्ट केले.