मुंबई: भाजपने मिळवलेल्या यशाचे मुक्तकंठाने कौतुक करतानाच उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल कमालीचे सावध झाले आहेत. संघटना वाढवू न शकणाऱ्या मंत्र्यांना नारळ दिला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनापर्यंत प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीकडे लक्ष दिले जाणार आहे. मंत्र्यांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही समजते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकलांनंतर ज्या मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळाले नाही त्यांना पक्षातील ज्येष्ठ संघटनाचालकांनी यापूर्वीही समज दिली होती. तुमच्या कामगिरीकडे लक्ष आहे, असे सांगण्यात आले होते.
भाजप विस्तारवादाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने आता सावध पावले टाकली जाणार आहेत. मोठा भाऊ असलेल्या भाजपची घोडदौड कौतुकास्पद आहे. मात्र, त्यामुळे भाजप पुढे काय करेल, याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेत व्यक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा लवकरच आढावा घेतला जाईल. पालकमंत्री तसेच संपर्कमंत्री नेमके काय करतात, याकडेही आता लक्ष दिले जाते आहे. अडीच वर्षांनी भाकरी फिरवली जाईल अन् ज्यांना मंत्री केले नाही, त्यांना संधी दिली जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते.