Eknath Shinde File Photo
मुंबई

Maharashtra Politics: आमदारांच्या विकासकामांना प्राधान्य द्या, अन्यथा मंत्र्यांना पदावरून हटवू; एकनाथ शिंदे यांनी भरला दम

शिंदे यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांची बैठक नंदनवन बंगल्यावर मंगळवारी बोलवली होती.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या गटाच्या आमदारांनी आणलेली विकासकामे करण्यास प्राधान्य द्यावे. केवळ आपल्या स्वतःचे मतदारसंघ बघू नका तर आमदारांची कामे झाली पाहिजेत, माझ्याकडे तक्रारी आल्या तर कोणालाही पदावरून हटविण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा दम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या मंत्र्यांना दिला.

आपल्या गटाच्या काही मंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशा तक्रारी शिंदे गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे याबाबत शिंदे यांनी आपल्या मंत्री आणि आमदारांची बैठक नंदनवन बंगल्यावर मंगळवारी बोलवली होती.

आपल्या पक्षाकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे आम्ही विकास कामांबाबतची पत्रे मंत्र्यांना देत असतो. पण बहुतांश पत्रांवर कोणतीही चर्चा मंत्री करत नाहीत. तसेच सदर प्रस्ताव हे प्रशासकीय कार्यवाहीसाठी पुढे पाठवले जात नाहीत, अशा तक्रारी काही आमदारांनी यावेळी केल्या. आमदारांच्या तक्रारीची दखल शिंदे यांनी घेतली. त्यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले.

आमदारांनी कोणत्या कामांची पत्रे दिली त्यावर काय कार्यवाही झाली याबाबतची माहिती मला मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे यांनी, आपल्या मंत्र्यांच्या कामांचा खातेनिहाय आढावा घेतला.

यावेळी मंत्री आणि त्यांच्या खात्यांचे सचिवही हजर होते. प्रत्येक मंत्र्यांनी आपण कोणत्या योजना राबवत आहोत, त्याची सद्य:स्थिती काय आहे, याबाबतची माहिती दिली. काही खात्यांच्या सचिवांनी आपल्या योजनाचे सादरीकरण केले. योजना केवळ कागदावर नकोत तर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT