सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी महामंडळाच्या विविध संघटनांची बैठकीत बोलताना एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक  (Eknath Shinde X Account)
मुंबई

ST Employees DA Hike | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर: महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ, १ कोटींचा अपघाती विमा; उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Eknath Shinde Announcement | जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास

पुढारी वृत्तसेवा

Dearness Allowance Hike ST Staff Benefits Eknath Shinde Announcement

मुंबई : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ, १ कोटी रुपयांचा अपघाती विमा तसेच ३५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९ ऐवजी १२ महिन्यांसाठी मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी (दि.३) आयोजित केलेल्या एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, विविध कर्मचारी संघटनांचे नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या कर्मचाऱ्यांना पूर्वी मूळ वेतनावर ४६ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता जून २०२५ पासून त्यामध्ये भर पडणार असून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सेवेतील ७८ हजार कर्मचाऱ्यांना हा लाभ होईल. महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येईल.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय लाभ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांचा अपघाती विमा दिला जाईल. मात्र, त्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक पर्याय निवडावा.

सामान्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. बसगाड्यासह बसस्थानके, स्वच्छतागृह व विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले पाहिजे. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावर भर दिला पाहीजे. बसस्थानके हे बस पोर्ट झाली पाहिजे. तसेच एसटी तोट्यातून वर कशी काढता येईल. याचाही अभ्यास करावा. एसटीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहीजे.

परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना स्टेट बँकेमार्फत अपघाती विमा कवच लागू करण्याबाबत बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये आहेत, अशा कर्मचाऱ्यांना कामगिरीवर असताना- नसताना (दोन्ही प्रकरणी) अपघात झाल्यास विमा कवच लागू करण्यात येत आहे. त्यामध्ये वैयक्तिक अपघातात निधन झाल्यास १ कोटी, पुर्णतः अपंगत्व आल्यास १ कोटी, अंशतः अपंगत्व आल्यास ८० लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT