मुंबई

सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच विरोधकांवर ‘ईडी’चे छापे : अतुल लोंढे

मोहन कारंडे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर 'ईडी'ने आज छापे टाकले. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. भारतीय जनता पक्ष हा सीबीआय, आयकर, ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे देशाने पाहिले आहे. आजची छापेमारी त्याचाच एक भाग असून सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी भाजपचा हा डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज केला.

अतुल लोंढे म्हणाले की, "बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी उभारलेली सहकार चळवळ मोडीत काढण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. त्यासाठी केंद्रात स्वतंत्र सहकार खाते निर्माण केले. राज्यात ईडी, सीबीआयसाठी सुपारी घेऊन काम करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या त्यासाठी एजंटचे काम करत आहेत. विरोधी पक्षांच्याच साखर कारखान्यांवर ईडीचे छापे का पडतात? भाजप नेत्यांच्या कारखान्यांवर छापे का पडत नाहीत? नोटाबंदीमध्ये सहकारी बँकेतील पैसे घेण्यास रिझर्व्ह बँकेने नकार का दिला होता? भाजपाच्या काही नेत्यांनी सहकारी साखर कारखाने उभारले पण ते त्यांना चालवता आले नाहीत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सहकाराच्या माध्यमातून समृद्ध झालेला आहे. सहकारी संस्थांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे, हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सहकारी संस्था व त्यांच्याशी संबंधित लोकांना त्रास दिला जात आहे."

 कारवाईसाठी देण्यात आलेली कारणेही हास्यास्पद आहेत. अनुभव नसलेल्यांना कारखाने चालवण्यास दिले, असे त्यांचे कारण आहे. असे असेल तर मग देशाच्या संरक्षणाशी संबंधित राफेलच्या देखभालीचे कंत्राट उद्योगपती अनिल अंबानी यांना कागदाचे विमानही बनवण्याचा अनुभव नसताना कसे दिले? सोमय्या यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नंतर हेच नेते भाजपात गेले त्यावर सोमय्या काहीच का बोलत नाहीत? भाजपात गेल्यावर हेच भ्रष्ट नेते पवित्र होतात का? हा खेळ आता जनतेच्या चांगलाच लक्षात आला आहे, असेही लोंढे यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT