मुंबई: धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धीरेंद्र शास्त्री यांचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला होता. यावरून विरोधकांनी आक्षेप घेत जोरदार टीकास्त्र सोडले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, विकृत धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने समृद्ध केलेल्या संत परंपरेशी या बागेश्वर बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे.
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी देखील मुख्यमंंत्र्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना असे वक्तव्य करण्यापासून रोखायला हवे होते, असे मत व्यक्त केले आहे. राऊत म्हणाले की, अशा बुवा आणि महाराजांना आणून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय?
हे बुवा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासावरती बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवे होते किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवे होते. त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवी होती.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनीदेखील धीरेंद्र शास्त्री यांच्यावर एक्सवर पोस्ट करत टीका केली. चार मुलं जन्माला घालून एक मुल संघाला द्या, हे भोंदू बागेश्वर बाबाचे वाक्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचे लक्षण आहे.
महिलांना केवळ मुलं जन्माला घालण्याचे मशीन समजून त्यांना चूल आणि मुलापुरतंच मर्यादीत करु पाहणारा हा भोंदू बागेश्वर बाबा एकप्रकारे मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन आहे. राजकीय व्यासपीठावर हा भोंदू असली वक्तव्ये करत असेल तर हेच का यांचं नारीशक्ती वंदन? या भोंदूला काही नेते संत म्हणत असतील तर महाराष्ट्राचे याहून मोठं वैचारिक अधःपतन ते कोणते? असा सवाल रोहित पवार यांनी केला.