मुंबई: राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सरासरीपेक्षा मोठी वाढ झाली आहे. वाढीव मागणीचा पुरवठा केला जात असला तरी त्यामुळे कृत्रिम टंचाईसदृश स्थिती निर्माण केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांवर नागरी पुरवठा आणि गृहविभागाकडून संयुक्तपणे कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिला.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. राज्यातील इंधन पुरवठ्याची आकडेवारी मांडत मुख्यमंत्री म्हणाले, सध्या राज्यात पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा 23 टक्के, तर डिझेलच्या मागणीत तब्बल 52 टक्के वाढ झाली असून सरकारकडून त्याचा पुरवठाही केला जात आहे.
मात्र काही जिल्ह्यांमध्ये ही वाढ संशयास्पद आहे. अकोला जिल्ह्यात इंधनाचा खप 154 टक्क्यांनी वाढला आहे, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलडाणा, गोंदिया आणि हिंगोली या भागांत 70 टक्क्यांहून अधिक खप झाला आहे.
व्यावसायिक पेट्रोल-डिझेलचा खप मात्र कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी असणारे इंधन व्यावसायिक ठिकाणी वळवून काळा बाजार किंवा साठेबाजी केली जात आहे का याची सखोल पडताळणी करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत.