Jayant Patil Meets Devendra Fadnavis Pudhari
मुंबई

Jayant Patil Meets Devendra Fadnavis: मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या विमानात जयंत पाटील! चर्चेला उधाण

तिजोरीला मिळणार का वाली?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला सोमवारी जाणार असतानाच रविवारी अचानक मुंबई कोल्हापूर विमान प्रवासात गाठ पडली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अचानक पडलेल्या या भेटीचे कवित्व भलतेच रंगले.

दोघांचेही राजकीय विचार, वेगवेगळ्या दिशेने, भलतीकडे असताना अचानक पडलेल्या या भेटीचे विशिष्ट कारणासाठीची गाठभेट तर नाही ना असे अंदाज वर्तवणारे पतंग राजकीय आकाशात उडू लागले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घडले ते असे, सांगली येथे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी तसेच कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्या वास्तूच्या उद्‌घाटनासाठी देवेंद्र फडणवीस सकाळीच मुंबईहून निघाले. सध्या इंधन टंचाईच्या जागतिक घटनांमुळे पंतप्रधानांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सरकारच्या सेवेतील विशेष विमानाने न जाता प्रवासी विमानानेच ये जा करत असतात.

रविवारी सकाळी मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या या विमानातून ते सांगलीकडे निघाले तेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही याच विमानात होते. अध्यक्षमहोदय म्हणून आवाज देत दोघे बोलत असतानाच विमानतळावर ध्यानीमनी नसताना अचानक या दोघांची भेट झाली ती जयंत पाटील यांच्याशी! जयंत पाटील यांनीही ईश्वरपूर या सांगली जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघात जायला याच विमानाचे तिकिट काढले होते.

फडणवीस आणि नार्वेकर यांच्या जागा विमानातल्या पहिल्या रांगेत होत्या म्हणतात तर जयंत पाटील हे त्यांच्या मागेच दुसऱ्या रांगेत होते असेही सांगतात. अशा सार्वजनिक प्रवासात बोलणार तरी कसे? मनमोकळे तरी कसे करणार पण या एकत्र प्रवासाच्या या योगायोगाची चर्चा सर्वत्र सुरू झाली.

अर्थ खाते यापूर्वीही जयंत पाटील यांच्यासाठी रिकामे ठेवले होते म्हणतात. त्याच्या कहाण्या अजून ताज्या आहेत. अजित पवार यांनी भर सभागृहात " जयंतराव या इकडे, जागा ठेवली आहे बघा " असे आवाहन करत आणि "वरतून तुम्ही ऐकतच नाहीत" म्हणून रुसवाही व्यक्त करीत.

आता भलत्या वेळी भलत्या ठिकाणी ही भेट अवचित झाली तर खरी पण रुसवा फुगवा संपला का आणि जयंत पाटील हे देशाच्या आणि राज्याच्या विकासात सत्ताधारी बाकांवरून योगदान देणार का ही चर्चा पुन्हा एकदा रंगली. कोल्हापूर विमानतळ येताच तिघेही एका पाठोपाठ एक हास्यविनोद करत खाली उतरले. या भेटीची खूप चर्चा रंगेल हे त्यांच्या मनात होते की त्या पुढची काही समीकरणे ठरली होती याच्यावरही पतंग उडवणे सुरू झाले.

जयंत पाटील सातत्याने शरद पवार यांच्या मताविरुद्ध आपण कोणताही निर्णय घेणार नाही असे म्हणत असतात पण विलीनीकरणाच्या चर्चेत ते सहभागीही होत असत. त्यामुळे हवाहवाई झालेली ही सफर प्रत्यक्षात " धरातळावर उतरते का काय " याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. सांगली येथे जाताना दोघेही नेते वेगवेगळ्या गाडीने रवाना झालेत. विमानप्रवासात दूर बसले होते पण दिवसभर या एकत्र प्रवासाची चर्चा रंगली होती.

जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची 3 जुलैला भाजपात राष्ट्रवादी विलीन होतो का हे ठरवण्यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच भेट झाली होती असे जोरात सांगितले जाते त्यातच शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 23 जुलैला भेटले आणि मध्येच सात जुलैला शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली.

मी तुमच्या पाठीशी

मी तुमच्या पाठीशी ( बसलो ) आहे, असे जयंत पाटील यांना सांगायचे होते काय? राज्याचे अर्थ खाते सध्या मुख्यमंत्री फडणवीस सांभाळत आहेत. ते कुणाच्या तरी हातात सोपवण्याचे इरादे त्यांच्या मनात असताना सोमवारी दिल्लीत होणारी भेट वेगळीच ठरली आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातला राष्ट्रवादीचा गट एनडीए आघाडीत गेला तर इथे राज्यात जयंत पाटील पुन्हा एकदा अर्थमंत्री होणार काय याचे अंदाज बांधणे पुन्हा एकदा सुरू झाले.

साधा विमान प्रवास हा बातम्या तयार करणारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते आणि सांगलीत गेले तेव्हा जयंत पाटील होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा साधा विमान प्रवास हा बातम्या तयार करणारा ठरतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT