मुंबई

बंड फसले असते तर शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती; दीपक केसरकरांचे खळबळजनक विधान

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बंडाळीच्या वर्षपुर्तीला मंत्री दिपक केसरकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. जर बंडाचा हा डाव अयशस्वी झाला असता तर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना परत पाठविले असते आणि स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असे वक्तव्य केसरकर यांनी केले आहे.

ठाकरे गटाच्या गद्दार दिन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना गद्दार बोलणे हास्यास्पद आहे. मागच्या वर्धापन दिनाला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा अपमान केला. तुमच्या एक नंबरच्या शिलेदाराचा आपमान केला, अत्यंत अपमानित केले, खालच्या दर्जाची वागणूक दिली. हा अपनाम का केला, याचे उत्तर ठाकरेंनी द्यायला हवे. शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांनी तेंव्हा सांगितले होते की, "ज्यावेळी हा उठाव यशस्वी होणार की नाही असे जेंव्हा वाटले असते तेंव्हा सर्व आमदारांना परत पाठविले असते आणि एक फोन करून सांगितले असते की माझी चूक झाली आहे. त्यात या आमदारांचा काही दोष नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती." आपल्या सहकाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अशी भावना बाळगणारा नेता सच्चा असतो. उद्धव ठाकरे यांना सगळे परंपरेने, वारश्याने मिळाले. पण, एकनाथ शिंदे यांनी वागणुकीतून सहकाऱ्यांचे प्रेम मिळवले.

दरम्यान, या विधानावर पोलिसांनी दिपक केसरकरांना ताब्यात घेतले पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार एखाद्या माणसाच्या मनात घोळत असेल आणि ते केसरकरांना माहित असेल तर पोलिसांनी दखल घ्यायला हवी. कारण, विधानसभा अध्यक्षांनी घटनेला स्मरून जर निकाल दिला आणि कोणी आत्महत्या केली तर, असा सवाल राऊत यांनी केला.

SCROLL FOR NEXT