कांदिवली : अनिल चासकर
बोरीवली पूर्व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून उगम पावलेल्या दहिसर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे तसेच साचलेल्या राडारोड्यांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता. पावसाळा तोंडावर आला असतानाही नदीची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्याने श्रीकृष्ण नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
महापालिकेकडून नालेसफाईचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात दहिसर नदीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत होता. याबाबत दै. पुढारीने 18 मे रोजी आवाज उठवताच सहायक आयुक्त यांनी दखल घेत नदी पात्रातील साफसफाईला सुरुवात केली.
दहिसर नदीच्या पात्रात सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे आणि झुडपे वाढली आहेत की, अनेक ठिकाणी नदीत पाणीच दिसत नसल्याची परिस्थिती आहे. विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत नदीपात्रात तब्बल चार ते पाच फूट उंचीची झुडपे वाढल्याचे दिसून येत आहे.
स्थानिकांच्या मते, मुंबईत यापूर्वी आलेल्या महापुरावेळी याच दहिसर नदीत वाहने वाहून गेली होती. तसेच मागील सहा वर्षांत नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्यामुळे श्रीकृष्ण नगर परिसरात दोन वेळा पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदाही मुसळधार पावसात परिसर जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात होती.यावर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश घोणे यांनी सहाय्यक आयुक्तांना लेखी पत्र देत दहिसर नदीची तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली होती.
याशिवाय द्रुतगती मार्गालगत नव्याने बांधलेल्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात रॅबिट्स, दगडधोंडे आणि कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नदीपात्रातील गाळ, झुडपे आणि मोठमोठे दगड धोंडे यासह अतिक्रमणसदृश अडथळे तातडीने हटविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
पर्जन्य आणि जलवाहिनी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याना सांगून साफ सफाई करण्यात येईल. मी देखील जातीने पाहणी करेन, असे पर्जन्य जलवाहिनी विभागाचे उपमुख्य अभियंता रोहित त्रिवेदी यांनी सांगितले.