मुंबई : मुंबईसह राज्यातील चार महनगरात सायबर गुन्हेगारांनी केलेल्या फसवणुकीमुळे नागरिकांचे तब्बल 7 हजार 635 कोटी रुपये बुडाले आहेत. केवळ 2024 या एका वर्षातील ही आकडेवारी असून याप्रकरणी 8 हजार 974 गुन्हे दाखल झाले असून 1 हजार 7 आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी काँग्रेस आमदार मोहन मते यांच्यासह ज्योती गायकवाड, विकास ठाकरे, अमिन पटेल आणि ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांच्यासह विविध आमदारांनी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपुर शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे या शहरांतील सायबर फसवणुकीबाबतची माहिती जाहीर केली आहे.त्यानुसार मुंबई शहरात गेल्या वर्षभरात 4 हजार 849 गुन्हे दाखल करण्यात आली असून 757 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात नागरिकांची एकूण 888 कोटी 29 लाख 23 हजार 95 रुपयांची फसवणूक झाली आहे.
तर ठाणे शहरात 680 गुन्ह्यात 13 जणांना अटक करण्यात आली होती. यात एकूण 174 कोटी 4 लाख 36 हजार 6 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर शहरातील एकूण 212 गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण 63 कोटी 85 लाख 9 हजार 501 रुपयांची फसवणूक झाली आहे. पुणे शहरात सर्वाधिक एकूण 1 हजार 504 गुन्ह्यात 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातून 6 हजार 7 कोटी 93 लाख 4 हजार 398 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.