मुंबई : भंगार विक्रीतून अजहर नावाच्या सहकाऱ्याची त्याच्याच दोन मित्रांनी दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही मारेकऱ्यांना कुठलाही पुरावा नसताना वनराई पोलिसांनी अटक केली. शिशिपाक संशोराम सिंग आणि राजेश रमेश नाथ अशी या दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीसकोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 24 फेब्रुवारीला गोरेगाव येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह वनराई पोलिसांना सापडला होता.
पंचनामा करुन हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. यावेळी त्याच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे वनराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला होता.
मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. तपासादरम्यान तो व्यक्ती कचरा वेचणारा असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी गोरेगाव ते दहिसर परिसरातील कचरा वेचणाऱ्या पन्नास ते सत्तरहून अधिक लोकांची चौकशी केली होती. त्याच्या छायाचित्रावरुन त्याचे नाव अजहर असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या हत्येनंतर त्याचे दोन मित्र सुरेश कालिया आणि सलीम ऊर्फ नेपाळी हे दोघेही अचानक गायब झाले होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.