मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महाराणी म्हणजेच ताराराणी जैन होत्या, असे आक्षेपार्ह विधान करून आचार्य नयन पद्मसागर मुनी यांनी मंगळवारी खळबळ उडवून दिली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या जैन मुनी विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
दादरच्या स्वामीनारायण मंदिरातरातील योगी सभागृहत झालेल्या एका कार्यक्रमात आचार्य नयन पद्मसागर मुनी यांनी हे विधान केले. ताराबाई देवीने औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारून त्याला परास्त करायचे ठरवले आणि धूळ चारण्याचे काम या एका जैन राणीने केले. हा जैन महिलांचा इतिहास आहे, असे जैन मुनी नयन महाराज म्हणाले.
आचार्य नयन पद्मसागर म्हणाले की, “मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले, त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही.
संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी.“
आचार्य नयन पद्मसागर यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले की, स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या ताराराणी कन्या होत. शिवपुत्र राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी आहेत. महाराणी ताराबाई या मराठा समाजाच्या असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत.
ताराबाई सारख्या महापराक्रमी व्यक्ती आपल्या जाती धर्मामध्ये असाव्यात अस वाटणं लोकांना साहजिक आहे. मात्र त्यासाठी म्हणून इतिहासात बदल करण्याचे अधिकार कोणालाही नाही. जैन धर्म सत्य अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो. अशा धर्मातल्या लोकांनी असे बोलणे चुकीचे आहे.
आचार्य नयन पद्मसागर यांच्या विधानावर गिरगावातही तीव्र प्रतिक्रिया उमटली. आज महाराणींना जैन ठरवले, उद्या हे साक्षात महाराजांबद्दलही हेच बोलतील, तेव्हा गप्प बसणार का , असा सवाल करत या मुनींवर कारवाई करण्याची मागणी आम्ही गिरगांवकर या संघटनेने केली.