कधीकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड होता. दहापैकी दहा काँग्रेस-रिपाइं आघाडीचे खासदार, 62 पैकी 80 टक्के आमदार काँग्रेस-मित्र पक्षांचे निवडून येत होते. एकेकाळी काँग्रेसचे चिन्ह पंजा मिळाला की जनता हात द्यायची; पण आज काँग्रेसला हात दाखविला जात आहे. थोडक्यात, काँग्रेसला कोणीही हरवू शकत नव्हते. आज काँग्रेसला काँग्रेसच पराभूत करू शकते हे पुन्हा एकदा चंद्रपूरमध्ये सिद्ध झाले.
आज या विदर्भ गडावर भाजपचा झेंडा डौलाने फडकत आहे. विरोधक ईव्हीएम आणि इतर काहीही कारणे देत असले तरी 365 दिवस, 24 तास भाजप इलेक्शन मोडवर असल्याने हे शक्य होऊ शकले हे वास्तव आहे. आता हेच पाहा जिल्हा परिषद निवडणुकीला उशीर असला तरी भाजपची तयारी जोरात सुरू झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीपाठोपाठ मनपातही भाजप महायुतीची सत्तेची घोडदौड दिसली. काही ठिकाणी आकड्यांचे समीकरण जुळत नसताना भाजपने सत्ता कायम टिकवली आहे. दिल्ली ते गल्ली...भाजपची सत्ता असल्याने अगदी कट्टर विरोधक असला तरी कुणालाही सत्तेचा मोह टाळता येत नाही हे देखील उघड झाले.
पश्चिम विदर्भातील अकोला काँग्रेसच्या हातून गेले. अमरावतीची सत्ता महायुतीच्या ताब्यात गेल्यात जमा असताना पूर्व विदर्भातील चंद्रपूर काँग्रेसला जनतेने सर्वाधिक जागांचा कौल देऊनही सांभाळता आले नाही. नेत्यांनी दिल्ली दरबारी नमते घेतले. फॉर्म्युला ठरला, मात्र ठरलेल्या गणिताला, दिलेल्या शब्दाला कुणीच अगदी मित्रपक्षही जागला नाही. नेत्यांचा बेबनाव, समन्वयाचा अभाव यात काँग्रेसच्या हातून सत्ता गेली. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर यांच्यातील टोकाला गेलेला संघर्ष मनपा निवडणुकीनंतरच्या घडामोडीत अधिक वाढला.
विदर्भातील चार महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. नागपुरात चौथ्यांदा भाजपने एक हाती सत्ता राखली. एकमत न झाल्याने बहुमत असूनही मनपाची तिजोरी मानली जाणाऱ्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड खोळंबली. सदस्यच ठरले नाही. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठीही वेट अँड वॉच सुरू आहे. इच्छुकांवर टांगती तलवार आहे. अमरावतीत त्रिशंकू अवस्थेत महायुतीचे मनपातील सत्तेचे गणित जुळले. भाजप, युवा स्वाभिमान व राष्ट्रवादी काँग्रेस तुझे माझे जमेना....सोडून सत्तेसाठी एकत्र आले.