मुंबई : लोकसभेच्या निकालाचा आधार घेत काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत १२५ जागा लढविण्याचे ठरविले आहे. या १२५ जागांमध्ये ८० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी निश्चित केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १७ जागा आल्या होत्या. त्यात १४ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आधार घेतला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात काँग्रेसने दुय्यम भूमिका घेतली होती; परंतु जागावाटपात काँग्रेस 'ए' आणि 'बी' अशा दोन प्लॅनवर विचार करीत आहेत. 'ए' म्हणजे हमखास निवडून येणाऱ्या जागा, तर 'बी' म्हणजे थोडे कष्ट घेतल्यानंतर निवडून येणाऱ्या जागा.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बोलणी यावेळी अत्यंत गुप्तपणे वरिष्ठ नेत्यांमध्ये होत आहेत. यात काँग्रेसने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या ४४ जागा, यासोबत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने मताधिक्य मिळविले, या जागांवर दावा केला आहे. त्याचबरोबर ठाकरे गट आणि शरद पवार गटाने लोकसभेच्या ज्या जागा जिंकल्या आहेत, त्यातील मुस्लिम, दलित, आदिवासीबहुल जागा काँग्रेसने मागितल्या आहेत.
ज्यांचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री हाच फॉर्म्युला असेल, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ आघाडीत सर्वाधिक जागा जिंकून आणण्यावर लक्ष द्या, असे राज्यातील नेत्यांना सांगण्यात आले आहे.