मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने गेल्या चार वर्षांत (जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2025) पश्चिमी समुद्रकिनार्यावर 3,200 हून अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. या कालावधीत 10,000 हून अधिक संकटाच्या (डिस्ट्रैस) इशार्यांवर प्रतिसाद देत त्यांनी 770 हून अधिक शोध आणि बचाव मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या.
वेस्टर्न मेरीटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरमध्ये जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2025 दरम्यान 10,474 संकटाचे इशारे नोंदवले गेले.
774 मोहिमांमध्ये 3,193 लोकांना वाचवण्यात आले आणि वैद्यकीय कारणास्तव 165 लोकांना बाहेर काढण्यात आले.
10,474 इशार्यांपैकी 5,842 इशारे खोटे आणि 3,736 अज्ञात असल्याचे आढळले. म्हणजेच 91.44 टक्के इशारे निरर्थक होते.
2016 ते 2020 या मागील पाच वर्षांत 12,836 इशारे मिळाले होते. तेव्हाही सुमारे 88 टक्के इशारे खोटे किंवा अज्ञात होते.
तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा यांनी सांगितले की, आमचे अधिकारी आणि जवान 24 तास काम करून सर्व इशार्यांवर त्वरित प्रतिसाद देतात.
स्थापनेपासूनची कामगिरी : 1977 मध्ये स्थापनेपासून ते आतापर्यंत 11,805 लोकांचे प्राण वाचवले आहेत.
तस्करीविरोधी कारवाई : तटरक्षक दल अमली पदार्थांची तस्करी आणि समुद्रातील अवैध मासेमारी यावरही कठोर कारवाई करत आहे.
यावर्षी सहा जहाजे ताब्यात घेत 22 कर्मचार्यांविरुद्ध कारवाई केली. ज्यात 1,838.36 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
स्थापनेपासून जप्त केलेल्या तस्करी मालाचे एकूण मूल्य 54,399.33 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अवैध मासेमारी : अवैध मासेमारीविरोधी कारवायांमध्ये दलाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण 1,638 बोटी जप्त करण्यात आल्या असून, 13,775 मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे.
आपत्ती निवारण : 1999 पासून दलाने 96 आपत्ती मदत कार्य आणि 100 तेल गळती घटना हाताळल्या आहेत.