मुंबई : राज्यात कुठेच इंधनाची टंचाई नाही. अफवांमुळे लोक ‘पॅनिक’ होऊन जास्त पेट्रोल भरायला सुरुवात करतात तेव्हा पुरवठा साखळीत व्यत्यय येतो. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता ‘पॅनिक बाईंग’ करून पुरवठा साखळी बिघडवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे.
बुधवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या जिल्ह्यात किंवा पेट्रोल पंपावर वर्षानुवर्षे महिन्याला आणि दिवसाला किती पेट्रोल लागते याआधारे साठा ठेवला जातो. त्यामुळे सर्वत्र पुरवठा साखळी तयार होते. शिवाय, आपल्याकडे पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असल्याचे केंद्र सरकारनेही वारंवार सांगितले आहे; पण अफवांमुळे लोक घाबरून जादा पेट्रोल-डिझेल भरतात. तेव्हा पुरवठा साखळीत व्यत्यय येतो. याचा अर्थ साठा कमी आहे, असे नाही. अशा घबराटीमुळे गोंधळाची परिस्थिती तयार होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवार बोलले ते महत्त्वाचे
शरद पवार यांनी सांगितले ते महत्त्वाचे आहे. ज्यावेळी अनेक लोक पंतप्रधान मोदी परदेशात का गेले? तिकडे काय होते? अशी टीका करत होते त्यावेळी भारताने या दौर्यात वेगवेगळ्या देशांसोबत धोरणात्मक करार केले आहेत. यामुळे पुढच्या 15 ते 20 वर्षांचे आपले भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच शरद पवार यांनी विनाकारण टीका करू नका, असे सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.