मुंबई: कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने कर्करोगावरील जीवरक्षक औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवणारी संस्था राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण अर्थात एनपीपीए कार्बोप्लॅटिन, सिस्प्लॅटिन आणि ऑक्सालिप्लॅटिन यांसारख्या प्लॅटिनम-आधारित कर्करोगविरोधी औषधांच्या किमती वाढवण्यास मंजुरी देण्याचा विचार करत आहे.
ही औषधे डोके व मान, स्तन, तसेच जठरांत्र (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) कर्करोगांसह विविध प्रकारच्या कर्करोगांच्या उपचारांसाठी वापरली जातात.
४ जून रोजी एनपीपीएने प्रमुख औषध उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटलसह काही प्रमुख कर्करोग रुग्णालयांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तीन जीवनरक्षक औषधांच्या किमतींमध्ये ५० टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे.
सध्या कार्बोप्लॅटिनच्या १० एमजी व्हायलची कमाल किंमत ₹६१.१० आहे. सिस्प्लॅटिनची किंमत औषधाच्या शक्तीनुसार प्रति व्हायल ₹७० ते ₹३०० दरम्यान आहे. डिसेंबर २०२५ पासून उत्पादकांनी औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये १००% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे नोंदवले आहे.
एनपीपीएने उत्पादकांना गेल्या पाच वर्षांतील कच्च्या मालाच्या किमतींची लेखापरीक्षित माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. कठोर किंमत नियंत्रणामुळे देशांतर्गत उत्पादनात अडथळे निर्माण होत असल्याचे उद्योगाचे म्हणणे आहे. अहवालानंतर एनपीपीएने उत्पादकांकडून अतिरिक्त माहिती मागवली आहे.
यामध्ये गेल्या पाच वर्षांतील कच्च्या मालाच्या किमतींतील वाढीचा तपशील आणि त्याचे लेखापरीक्षण केलेले पुरावे समाविष्ट आहेत. सूत्रांच्या मते, गेल्या सहा महिन्यांत कच्च्या मालाच्या किमतींमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मात्र औषधांच्या अंतिम विक्री किमती वाढविण्यात आलेल्या नाहीत. कार्बोप्लॅटिन १० एमजीची किंमत २०१६ मध्ये ₹४९.३८ होती, जी एप्रिल २०२६ मध्ये ₹६०.४८ झाली. म्हणजेच दहा वर्षांत औषधाच्या कमाल किमतीत सुमारे २२% वाढ झाली, तर त्याच्या मुख्य घटक असलेल्या प्लॅटिनमच्या किमतीत याच काळात २२५% वाढ झाली आहे.
उत्पादनात निर्माण होत आहेत अडथळे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथील कर्करोगतज्ज्ञ डॉ. मोहन मेनन म्हणाले, आरोग्यसेवा सर्वांसाठी परवडणारी ठेवण्यासाठी किंमत नियंत्रण आवश्यक आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत यामुळे उत्पादनात अडथळे निर्माण होत आहेत.
तयार औषधांच्या किमती सरकारने निश्चित केल्यामुळे प्लॅटिनमच्या किमतीतील अचानक वाढ अनेक भारतीय औषध कंपन्यांसाठी उत्पादन सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या कठीण बनवत आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे देशभरातील कर्करोगतज्ज्ञांना उपचारपद्धती बदलणे, उपचारचक्र पुढे ढकलणे किंवा पर्यायी औषधांचा वापर करणे भाग पडत आहे, जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचवता येतील.