मुंबई

मुंबईत आता गुन्हेगारांचे चेहरे ओळखणारे कॅमेरे

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सध्या मुंबईत कृत्रिम बुद्धीमत्तेसह गुन्हेगारांचा चेहरा ओळखणारे कॅमेरे बसवण्यात आले असून त्यामुळे रस्त्यांवरील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठी मदत होत असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि मुंबईकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ताज पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित '२६/११ मुंबई संकल्प' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या एका समितीने मुंबई शहर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यानी सज्ज करण्याची सूचना केली होती. त्यानुसार २००९ मध्ये मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम सुरू झाला. मात्र २०१४ सालपर्यंत तत्कालीन राज्य सरकारला हे कॅमेरे बसवता आले नाहीत. मी हे कॅमेरे बसविण्याचे काम सुरु केले आणि पुढील एका वर्षाच्या आत मुंबईला सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणले. आता चेहरा ओळखणारे कॅमेरे वापरत आहोत, असे फडणवीस म्हणाले.

याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब कसा पेरला त्याचा पर्दाफाश झाला, अशी आठवण करून देत, फडणवीस म्हणाले, या कॅमेऱ्यांमुळे मुंबईत घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना गजाआड करण्यास मदत होत आहे.

SCROLL FOR NEXT