मुंबई: दक्षिण मुंबईतील भायखळा येथील उमरखाडी परिसरातील ८१ इमारतींचा समूह पुनर्विकास म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे केला जाणार आहे. ६.२३ एकरच्या या प्रकल्पात सध्या उपकरप्राप्त इमारती, पीएमजीपी इमारती आणि काही खासगी इमारतींचा समावेश आहे.
पुनर्विकासाअंतर्गत उमरखाडीमध्ये
४० ते ८१ मजल्यांच्या ७ इमारती बांधल्या जातील. यात २ हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन केले जाईल. बांधकाम आणि विकास संस्था या प्रारुपानुसार हा प्रकल्प राबवला जाणार असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम दुरुस्ती मंडळाने हाती घेतले आहे. येथील इमारतींमध्ये १ हजार ९२८ निवासी आणि २६८ अनिवासी गाळे आहेत. या सर्व इमारती आता दुरुस्ती करण्यास पात्र नाहीत.
मंडळाच्या प्राथमिक प्रस्तावानुसार या प्रकल्पासाठी ४५०१.९७ कोटी रुपये खर्च येणार आहे. यातून मंडळाला १०४१.७४ कोटी रुपये महसूल प्राप्त होईल. पात्र रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी २७ हजार ५०० रुपये, तर तिसऱ्या वर्षी ३० हजार २५० रुपये भाडे दिले जाणार आहे.
अनिवासी गाळ्यांसाठी प्रति चौरस फूट १०० रुपये भाडे दिले जाणार असून त्यात दरवर्षी १० टक्क्यांची वाढ केली जाईल. कामाठीपुरापाठोपाठ दुरुस्ती मंडळाचा हा दुसरा समूह पुनर्विकास प्रकल्प असेल.
समूह पुनर्विकासाचा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आता सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतरच पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
२५ हजार रुपये घरभाडे
पुनर्विकासास पात्र रहिवाशांना प्रति महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षी २७,५०० रुपये, तर तिसऱ्या वर्षी ३०,२५० रुपये घरभाडे दिले जाणार आहे, तर अनिवासी रहिवाशांना प्रति चौरस फूट १०० रुपये भाडे दिले जाणार असून त्यात दरवर्षी १० टक्क्यांची वाढ केली जाणार आहे.