मुंबई : पुढारी वृत्तसेवा
टाइम्स नाऊ नवभारत - मॅट्रिझ या संस्थांनी संयुक्तरीत्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या सर्वेक्षणानुसार लोकसभेत भलेही महाविकास आघाडीची कामगिरी सरस झाली असली तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीपेक्षा महायुतीची कामगिरी सरस ठरणार असल्याचे चित्र या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. महायुतीला १३७-१५२ तर महाविकास आघाडीला १२९- १४४ जागा मिळण्याची शक्यता या सव्र्व्हने वर्तविली आहे.
भाजप हा राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरेल तर काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असे संकेतही टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिझने केलेल्या सर्वेक्षणात प्राप्त झाले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार महायुती सहजरीत्या महाराष्ट्रात पुन्हा सरकार बनवेल, असे निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आलेले आहे.
भाजपच ठरेल राज्यात मोठा भाऊ टाइम्स नाऊ आणि मॅट्रिझच्या अंदाजानुसार भाजपला २६.२ टक्के मतांसह ८३ ते ९३ जागांवर जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ओपिनियन पोलनुसार विधानसभेत भाजपच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. भाजपचा मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ६.८ टक्के मतांसह ४२- ५२ जागा जिंकण्याचा अंदाज आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादी ही २.८ टक्के मतांसह ७ ते १२ जागा जिंकण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. मविआत काँग्रेसची कामगिरी उत्तम टाइम्स नाऊ नवभारत मॅट्रिझच्या सर्वेक्षणात काँग्रेस १६.२ टक्के मतांसह ५८-६८ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. ठाकरेंची शिवसेना १४.२ टक्के मतांसह २६- ३१ जागा जिंकण्याची शक्यता आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी १३.७ टक्के मतांसह ३५ ते ४५ जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.