Ravindra Chavan Delhi visit Pudhari
मुंबई

Ravindra Chavan Delhi visit: भाजप उमेदवार नावनिश्चितीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीत

पक्षासाठी 15 वर्षे काम करणाऱ्यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: भाजपकडून विधान परिषदेवर पाच नेत्यांना पाठवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि.27) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला जाणार आहेत. पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी सल्लामसलत करून नावे निश्चित होतील.

भाजपने 5 जागांसाठी 15 नावे निश्चित केली होती. त्यानंतर त्यामध्ये आणखी 11 नावांची भर पडली. प्रदेशवार प्रतिनिधित्व देण्यावर तसेच संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व असे या वेळचे सूत्र आहे. या आधारावर जुन्या-जाणत्या, पण पक्षासाठी पुढची किमान 15 वर्षे काम करू शकणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

नितीन नबीन यांच्या कार्यपद्धतीबद्दल उत्सुकता

काँग्रेसचा त्याग करून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे. उर्वरित पाच जागंवर चर्चा होईल. भाजपचे गेल्या काही वर्षांतील धक्कातंत्र लक्षात घेता कोणत्याही संभाव्य उमेदवाराला स्वतःला संधीची खात्री देता येत नाही अशी अवस्था आहे, त्यामुळे श्रेष्ठ उमेदवार हे सूत्र प्रत्येकाने पक्के केले आहे. नितीन नबीन अध्यक्ष असल्याने त्यांची कार्यपद्धती कशी असेल त्यांचा भर कशावर असेल याबद्दलही महाराष्ट्रात उत्सुकता आहे.

बच्चू कडू यांची भूमिका अस्पष्ट

दरम्यान, शिवसेना शिंदे गटात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेच्या विलीनीकरणाबाबत काय केले जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. बच्चू कडू यांची यासंदर्भात भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. नीलम गोऱ्हेंंचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास परिषदेवर जाणाऱ्या सदस्यांमध्ये त्यांची कारकीर्द सर्वांत मोठी ठरण्याची शक्यता आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांची निवड होईल, असे मानले जाते.

राष्ट्रवादीतून अनेकजण इच्छुक

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची नक्की कोणाला उमेदवारी द्यायची, याबद्दल अजूनही वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. याबद्दल निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शब्द अंतिम असेल असे सांगण्यात येते. अवधूत तटकरे, राजेंद्र जैन, उमेश पाटील, सुरज चव्हाण अशी काही नावे सातत्याने चर्चेत येत आहेत.

उद्धव ठाकरे यांचे काय....

महाविकास आघाडीकडून निवडल्या जाणाऱ्या एकमेव उमेदवाराबाबत निर्णय होणे बाकी आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायची इच्छा असेल तर निवडणुका बिनविरोध होतील, असे मानले जाते. त्यांनी उमेदवारी घेण्याची तयारी दाखवली तर काँग्रेसतर्फे कोणतेही नाव पुढे येऊ शकणार नाही. ठाकरे यांनी तयारी दाखवली नाही तर मात्र पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या असतील; शिवाय उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे; पण राज्यसभेवर जाण्याची संधी काँग्रेसला मिळावी, अशीही अट टाकली गेल्याची जोरदार चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT