मुंबई

पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भारत दिघोळे स्थानबद्ध

दिनेश चोरगे

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१५) पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांना सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी स्थानबद्ध केले. पोलिसांनी सकाळपासूनच त्यांना पोलिस ठाण्यात नजरकैद ठेवले.

पोलिस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी मंगळवारी (दि.१४) भारत दिघोळे यांच्या घरी जाऊन त्यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. तसेच मंगळवारी रात्रभर दिघोळे यांच्या नाशिकमधील निवासस्थान पोलिस निगराणी ठेवण्यात आले. त्यानंतर बुधवारी (दि.१४) सकाळी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे गोपनीय शाखेचे हवालदार भगवान शिंदे, रोशन गायकवाड, प्रकाश उंबरकर यांनी भारत दिघोळे यांना घरातून ताब्यात घेतले. व सिन्नर पोलिस ठाण्यात स्थानबध्द केले. दिवसभर पोलिस ठाण्यात पोलिसांच्या निगराणीत असलेल्या भारत दिघोळे यांना सायंकाळी पंतप्रधान मोदी यांची प्रचारसभा संपल्यानंतर सोडून देण्यात आले.

देशातील उद्योजक, कलाकार, खेळाडू, राजकारणी यांना भेटणारे पंतप्रधान मोदी  शेतकऱ्यांना भेटत नाहीत. कृषीप्रधान अशी ओळख असलेल्या देशात शेतकऱ्यांनाच आपले प्रश्न मांडण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नाहीत. हे निश्चितच शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कांद्यावरील निर्यात बंदी कोणत्याही अटी शर्ती शिवाय सुरू करावी आणि कांदा निर्यात बंदीपासून मागील नऊ महिन्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी पोटी दरातील फरक म्हणून सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.
भारत दिघोळे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT