मुंबई : नरेश कदम
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीष महाजन, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री असताना, त्यांना डावलून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्र्यांच्या क्रमवारीत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ चौथा क्रमांक देण्यात आहे.
मंत्रिमंडळात मंत्र्यांची क्रमवारी ठरविली जाते. आमदारकीची किती टर्म, विरोधी पक्षनेतेपद भूषविले असेल, दिर्घ काळ मंत्री, माजी उपमख्यमंत्री असे अनेक निकष मंत्र्यांच्या क्रमवारीसाठी लावले जातात. त्यावरुन मंत्रिमंडळ बैठकीत बसण्याचा क्रम ठरविला जातो. ज्येष्ठतेनुसार विधिमंडळात आसन व्यवस्था ठरविली जाते.
मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट पक्षाने कापले होते. पण २०२४ मध्ये भाजपप्रणित महायुतीचे सरकार येताच त्यांना छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांना डावलून बावनकुळे यांना थेट चौथा क्रमांकावर बढती देण्यात आली आहे. राज्यशिष्ठाचार विभाग आणि विधिमंडळ सचिवालयाकडून ज्येष्ठतेनुसार मंत्री आणि आमदारांची क्रमवारी ठरविण्यात येते. मात्र यात बावनकुळे यांचा नंबर खाली होता. पण त्यांनी आपल्याला वरच्या नंबरवर बढती देण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांचा हट्ट पुरविला असल्याचे मंत्र्यालयातील सूत्रांनी सांगितले.
भाजपचे बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होते. तसेच ते ओबीसी समाजाचे आहेत. पक्षातील काही ओबीसी नेत्यांना शह देण्यासाठी बावनकुळे यांना पुढे आणले जात आहे. २०१४ ते २०१९ च्या सत्तेच्या कालखंडात चंद्रकांत पाटील यांना पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. बावनकुळे यांना ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष केले आहे. भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते आणि अनेक वर्षे मंत्री आहेत. गिरीष महाजन हे सुद्धा वरिष्ठ आहेत. पण सगळ्यांना मागच्या खुर्ध्यावर स्थान देण्यात आले आहे. बावनकुळे यांना ओबीसी म्हणून सरकारमधील सर्वोच्य पदाचीही लॉटरी लागू शकते, असे पक्षात बोलले जात आहे.