मुंबई: बारामती आणि राहुरी या विधानसभेच्या दोन्ही पोटनिवडणुका लढविण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिली आहे. उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियादेखील सुरू केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत अजित पवार गटाच्या नेत्यांनी विनंती केली तर केवळ बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय काँग्रेस घेईल, मात्र राहुरीची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
बारामतीसंदर्भात शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याने ही पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. सपकाळ यांनी सांगितले की, बारामतीच्या उमेदवारीसाठी सहा इच्छुकांचे अर्ज आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस उमेदवार देईल.
तटकरेंचे काय?
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही माझी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनच प्रामाणिक इच्छा आहे. महाराष्ट्राचा लाडका आणि दिग्गज नेता हरपल्यानंतर त्या आपल्या नेत्याप्रती, सहकाऱ्याप्रती असलेली सर्वांची ही एक जबाबदारी आहे.
शिवाय हेच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरूनही राहील. त्यामुळे महायुती अथवा महाविकास आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. मात्र काँग्रेसला त्यांनी तशी औपचारिक विनंती केलेली नाही किंवा अशी विनंती करण्याचे संकेतही दिलेले नाहीत.