मुंबई: राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांच्या ५ हजार १२ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांना मुलाखतींचे सीसीटीव्ही चित्रीकरण करून ते जतन करण्याचे निर्देश दिले आहेत.
पदभरतीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्यास संबंधित संस्थेवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित विद्यापीठांनी मुलाखत प्रक्रियेतील गुणांकनाचे निकष निश्चित करून गुणांकनाचे प्रपत्र तयार करावे.
तसेच उमेदवारांची पात्रता अचूक असल्याची तसेच निवडप्रक्रिया नियमानुसार पार पडल्याची खातरजमा करूनच अंतिम निवड यादीला मान्यता द्यावी, असे बजावले आहे. पारदर्शी पद्धतीने मुलाखती पार पाडण्याची जबाबदारी ही संबंधित निवड समितीवर निश्चित करण्यात आली आहे.
यासोबतच, संबंधित संस्था, विद्यापीठ, निवड समिती सदस्य आणि शासन प्रतिनिधींवर पारदर्शक पदभरतीची जबाबदारी असणार आहे.
सहायक प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेतील मुलाखतींचे सीसीटीव्ही प्रणालीद्वारे चित्रीकरण करावे. तसेच, मुलाखतीच्या दिनांकापासून किमान एक वर्ष हे चित्रीकरण गोपनीय दस्तऐवज म्हणून सुरक्षितपणे जतन करावे, अशा सूचना संस्थांना देण्यात आल्या आहेत.