मुंबई : स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणार्या आणि आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या नाशिकच्या अशोक खरात याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतून अटक केली आहे. ईडीच्या मुंबई आंचलिक कार्यालयाने मनी लाँडरिंग आणि कथित खंडणी प्रकरणाच्या चौकशीनंतर ही मोठी कारवाई केली. आरोपी खरातला 19 मे 2026 रोजी धन शोधन निवारण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, मुंबईच्या विशेष न्यायालयाने त्याला 26 मे 2026 पर्यंत 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ही माहिती ईडीने सोमवारी (दि. 25) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अशोक खरात हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात गुंतलेला नव्हता, तर या पवित्र क्षेत्राच्या आडून तो एक अत्यंत पद्धतशीर आणि संघटित खंडणीचे रॅकेट चालवत होता. भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांच्या मनात विविध भीती निर्माण करून तो त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या अवैध आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ईडीने मागच्या एका महिन्यात आक्रमक पावले उचलली आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने 13 आणि 14 एप्रिल, 17 एप्रिल, 23 एप्रिल, 5 मे आणि 18 मे 2026 रोजी आरोपी अशोक खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर एकापाठोपाठ एक धाडी टाकल्या. या प्रदीर्घ शोधमोहिमेमध्ये ईडीच्या हाती मोठे घबाड आणि महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. छाप्यात तब्बल 13.92 कोटी रुपयांची थेट रोकड आणि 5,500 अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहेत.