मुंबई; पुढारी वृत्तसेवा : साई रिसॉर्ट प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे आपण वारंवार सांगत होतो; पण आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले. दीड वर्ष नाहक बदनामी केली गेली. या बदनामीचा खटला हायकोर्टात दाखल केला आहे. किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल किंवा 100 कोटींचा दावा द्यावा लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सोमवारी दिला.
दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. ती याचिकाच सोमय्या यांनी मागे घेतली आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या अनिल परब यांनी सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठवली.
साई रिसॉर्टप्रकरणी हरित लवादाचा निर्णय विरोधात जाणार होता, म्हणूनच किरीट सोमय्या यांनी याचिका मागे घेतली आहे. त्यांच्या अन्य याचिकांचीदेखील हीच स्थिती होणार आहे. रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते म्हणून 'ईडी'ने चौकशी केली. एनजीटीने या प्रकरणात तथ्य नसल्याचे सांगितले. सोमय्या यांनी अब्रू जाईल म्हणून प्रकरण मागे घेतले. आता त्यांना हायकोर्टातील याचिकाही मागे घ्याव्या लागतील.