मुंबई: प्रचारातील आरोप - प्रत्यारोप, राजकीय हस्तक्षेपामुळे गाजत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी १२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. मात्र निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरवल्याने ४९.९० टक्के मतदान झाले आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत २०२१ मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर कच्च्या आणि अ वर्गातील मतदार याद्यांच्या गोंधळाच्या विरोधात काही सभासदांनी न्यायालयात दाद मागितली होती.
उच्च न्यायालयाने मतदार याद्यांना स्थगिती दिल्याने महामंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया लांबणीवर गेली. सुमारे एका तपाच्या खंडानंतर महामंडळाच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाला. महामंडळाच्या अंतर्गत कर्मचार्यांचे, कामगारांचे, चित्रपट कलाकार, तंज्ञत्र या सगळ्यांच्या प्रश्नांनी ही निवडणूक लक्षवेधी ठरली.
त्यातच राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी व अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्या उमेदवारी आणि प्रचारासाठी राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या आरोपावरून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, त्यानंतरही निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या समर्थ आणि रंगकर्मी पॅनल आणि अपक्ष असलेल्या उमेदवारांच्या पॅनलमुळे निवडणुकीच्या प्रचारात आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.
या सर्व पार्श्वभूमीवर चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी होणार्या मतमोजणीकडे समस्त कलाविश्वाचे लक्ष लागले आहे. महामंडळाच्या १७ जागांपैकी अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, संगीत-गायक गटातून आनंद शिंदे तर संकलन गटातून विजय खोचीकर बिनविरोध विजयी झाले आहेत.
रविवारी महामंडळाच्या राज्यातील १२ केंद्रांवर १४ जागांसाठी मतदान झाले. समर्थ पॅनलचे पतंग, तर चित्रकर्मी पॅनेलचे कप-बशी चिन्ह होते. त्यातील सोलापूर आणि नाशिक येथे मतदारांच्या सोयीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते. निवडणुकीत १२ केंद्रांवर ३,४०३ मतदारांपैकी १,६९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईत मतदारांची निवडणुकीकडे पाठ
चित्रनगरी असलेल्या कोल्हापूरमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला, या खालोखाल पुण्यामध्ये मतदारांनी हक्क बजावला. मात्र कलावंतांचं माहेरघर असलेल्या मुंबईत मात्र मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उन्हाळी सुट्ट्या, रविवार असल्याने रेल्वेचा मेगाब्लॉक आणि इतर कारणाने मुंबईतही मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.
सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. या सर्व मतदान केंद्रातील पेट्या कोल्हापूर येथे दाखल होणार असून आज (८ जून) रोजी कोल्हापूरातील गडकरी हॉल येथे मतमोजणी होणार आहे.- रागिणी खडके, निवडणूक निर्णय अधिकारी