Sanjay Raut on NCP merger
नवी दिल्ली : "अजित पवार यांना जे ओळखतात ते सांगतील की, त्यांनी कधीही भाजपच्या अजेंड्यावर काम केलं नाही. आपल्यावरच्या फाईल क्लिअर करून घेऊन त्यांनी पुन्हा मूळ प्रवाहात यायची धडपड सुरू केली होती, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २) माध्यमांशी बोलताना सांगितले. सुनेत्रा पवार यांनी दुःख विसरून शपथ घेतली आहे. त्यांना आता कर्तव्यासाठी बाहेर पडावं लागेल, असेही ते म्हणाले.
अजित पवार यांचा मृत्यू रहस्यमय आहे. अमोल मिटकरी यांनी विमान अपघाताबाबत उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आली होती. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शरद पवारांनी पहिल्याच दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यांनाही हळूहळू समजेल, अशा शब्दांमध्ये अजित पवारांच्या निधनावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत मांडले.
अजित पवार यांचा पक्ष आता पवार, पाटील यांचा पक्ष राहिला नाही. तो गोयल, पटेल, मोदी, शाह यांचा पक्ष होत आहे. तो मूळ पक्ष शरद पवार यांचा आहे; पण अमित शाह यांनी तो अजित पवार यांच्या हाती दिला. महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भाजपने गिळून टाकला आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या हातात अर्थसंकल्पातून भोपळा पडला आहे. जो महाराष्ट्र देशाच्या तिजोरीत जास्त भरणा करतो त्याला थातूरमातूर गोष्टी मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचं ओरबाडायचं आणि त्यालाच द्यायचं. बुलेट ट्रेन या गोष्टीचा आम्हाला काय उपयोग नाही, हे सगळं गुजरातसाठी आहे. शेतकरी, कष्टकरी यांना काय मिळालं, असा सवालही राऊत यांनी केला.
"आम्ही तमिळ जनतेच्या विरोधात कधीच भूमिका घेतली नाही, मात्र ही कसली दादागिरी सुरू आहे? काढा ना मोर्चा! पण ही कसली मुजोरी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे वागणं मान्य आहे का?" असा सवाल अशा प्रकारे मोर्चा काढणाऱ्या नेत्याला भाजपने तातडीने पक्षातून काढून टाकलं पाहिजे," असेही त्यांनी सांगितले. मुंबईच्या अस्मितेसाठी 'आम्ही गिरगावकर' संघटनेने पुकारलेल्या मोर्चात मी सहभागी होणार होतो. गिरगावकरांच्या भावनांशी मी सहमत आहे, पण सध्या काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीत असल्याने मला प्रत्यक्षात तिथे जाता येत नाहीये," असेही राऊत म्हणाले.