पुढारी ऑनलाईन डेस्क : राजीनाम्याच्या विषयावर कसलीच चर्चा झालेली नाही. कुणी काय आरोप करावेत, हे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. माझे म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात होऊ द्या. तपास यंत्रणा काम करत आहे. फेक नॅरेटिव्ह तयार केला जात आहे, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला. ते आज (दि. ६) पत्रकारांशी बोलत होते. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण दिले.
कोणी काय आरोप करावेत, लोकशाहीने अधिकार दिलेत. मी आरोप करणाऱ्या प्रत्येकाचे तोंड दाबू शकत नाही. जे आरोप करताहेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना प्रश्न विचारावा. विरोधकांनी अधिवेधनात चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य करत समिती नेमली. माझ्याकडे संशयाने बघितले जात आहे. त्यामुळे मी बोलणं योग्य नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने चांगले रान उठविले आहे. विरोधी पक्षाने राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर माजी खासदार संभाजीराजे यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. दरम्यान, मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, मुंडे यांनी राजीनाम्याच्या विषयावर चर्चाच झाली नसल्याचे सांगितले.