मुंबई : मनाप्रमाणे जागा मिळत नसल्याने महायुतीत नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे. अजित पवारांना सन्मानजनक जागा मिळणार नाहीत, याची कुणकुण लागल्याने त्यांच्या तंबूतील आमदारांनी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे मार्गक्रमण सुरू केले आहे.
अजित पवार महायुतीतून बाहेर पडू शकतात, असे स्पष्ट संकेत त्यांच्या गटातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील यांनी सोलापुरात एक वक्तव्य करून दिले. शरद पवारांसोबत निवडणूक लढविण्याचा योग येऊ शकतो, असे वक्तव्य पाटील यांनी केल्याने अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडतील या चर्चेने वेग घेतला. राजकीय वर्तुळात ही चर्चा वेगाने पसरल्यावरही राष्ट्रवादीतर्फे या बातमीला दुजोरा मिळालेला नाही आणि अद्याप त्याचे खंडनही करण्यात आलेले नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत जवळपास ८० ते ८५ जागा मागितल्या आहेत. सध्या अजित पवारांबरोबर अपक्ष आणि इतर पक्षाचे मिळून जवळपास ५० च्या आसपास आमदार आहेत. या सर्व ५० जागा तर मिळाल्याच पाहिजेत आणि यासोबतच आणखी ३० ते ३५ जागा मिळाव्यात, अशी अजित पवारांची मागणी आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला तेव्हा त्यांची ही मागणी पूर्ण होणार नाही, असे त्यांना शहा यांच्यातर्फे स्पष्ट करण्यात आल्याचे कळते. भाजप कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागेवर लढायला तयार नाही. एकनाथ शिंदे हे सुद्धा १०० जागांसाठी अडून बसले आहेत. लोकसभेला कमी जागांवर अजित पवारांची बोळवण करण्यात आली. मात्र विधानसभेला कमी जागा घेऊन तडजोड करण्याच्या तयारीत अजित पवार नाहीत. लोकसभेला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम केले नाही, असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
जवळचा मित्र, निवडणुकीतील चित्र आणि नाटकातील पात्र कधीही बदलू शकते. त्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत लढण्याचा योग येऊ शकतो, असे सूचक वक्तव्य राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष आ. राजन पाटील यांनी सोलापुरात केले.
पुन्हा शरद पवारांसोबत जाणे.
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणे.
छोट्या पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडीचे नेतृत्व करणे.
अजित पवार व उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा राजकीय प्रयोगही होऊ शकतो.