Railway Stations Pudhari
मुंबई

Railway Stations: नवी मुंबईतील दहा रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट!

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मध्य रेल्वे प्रशासनाला विकासकामांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे २०२६ मध्ये एका करारान्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकासकामे करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची आहे.

या रेल्वे स्थानकांमधील विकासकामे तात्काळ मार्गी लावून प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी मंगळवारी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ही विकासकामे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत मे २०२६ मध्ये एका करारान्वये सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली.

ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, सीवूड्स-दरावे आणि बेलापूर या स्थानकांची देखभाल व दुरुस्ती बरोबरच मुलभूत सुविधा आता मध्य रेल्वे प्रशासन देणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्दशनास आणून दिली.

सुखकर प्रवासाची रेल्वे मंत्र्यांकडून ग्वाही

सर्व स्थानकांतील पायऱ्या आणि पादचारी पुलांची, बसण्याच्या बाकांची तात्काळ दुरुस्ती करावी, शौचालयांचे नूतनीकरण आणि २४ तास स्वच्छता, पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, सर्व तिकीट खिडक्यांचे नियमित संचालन व्हावे, सुरक्षा आणि पुरेशी प्रकाशयोजना असावी, स्थानक परिसरात पुरेसे एलईडी दिवे लावावेत, रात्रीच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची (जीआरपी/आरपीएफ) गस्त वाढवावी या प्रमुख मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही नवी मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांना दिली.

समस्यांचा वाचला पाढा

ऐरोली आणि रबाळे येथे तिकीट खिडक्या बंद असून शौचालये जीर्ण अवस्थेत आहेत. पायऱ्या आणि फरश्या तुटलेल्या आहेत. घणसोली आणि कोपरखैराणे येथे प्रचंड वर्दळ असूनही तिकीट काउंटर अस्वच्छ असून सर्वत्र धूळ साचलेली आहे.

तुर्भे आणि सानपाडा स्थानकांत शौचालयांमध्ये तीव्र दुर्गंधी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि अपुरी प्रकाशव्यवस्था आहे. जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्थानकात पादचारी पुलांची दयनीय अवस्था असून काही खिडक्या बंद असल्यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांग लागते. सीवूड्स-दरावे आणि बेलापूर रेल्वे स्थानकांमध्येही स्वच्छतेचा भाव दिसून येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT