मुंबई: तात्पुरत्या तांत्रिक सुधारणांसाठी सलग सहा दिवस बंद ठेवलेले आपले सरकार पोर्टल पुन्हा सुरू झाले असले, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. डिजिटल महाराष्ट्रचा मोठा गाजावाजा होत असताना, ऐन शैक्षणिक हंगामात दाखले, अर्जांची पडताळणी आणि डिजिटल स्वाक्षरीची कामे ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या तांत्रिक बिघाडामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोर्टलमध्ये नेमके काय बदल केले आणि सहा दिवस सेवा का खंडित ठेवली, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे.
गंभीर तांत्रिक त्रुटींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी महाराष्ट्र व्हिएलई संवाद या आपले सरकार केंद्र धारकांच्या संघटनेने केली आहे. या बैठकीत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव, महाआयटीचे प्रतिनिधी आणि तांत्रिक कंत्राटदार यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
वारंवार कोलमडणाऱ्या सर्व्हरसाठी सक्षम बॅकअप यंत्रणा उभारणे आणि डिजिटल स्वाक्षरीतील अडथळे दूर करणे यावर या बैठकीत ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने या तांत्रिक अडचणींवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढून सर्वसामान्यांची होणारी अडवणूक थांबवावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
या तांत्रिक त्रुटींवर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने तातडीची बैठक बोलवावी, अशी मागणी जोर धरत आहे. या बैठकीत आयटी विभागाचे सचिव, महाआयटीचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञांसोबतच लोकप्रतिनिधींनाही पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. सर्व्हरची क्षमता वाढवून डेटा जतन करण्याची मुदत वाढवणे आणि डिजिटल स्वाक्षरीतील अडथळे दूर करणे यावर या बैठकीत प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल.