मुंबई : राज्यातील पोलाद उत्पादनात आतापर्यंत 81 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. पुढील काळात या क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असेल. यातून राज्यात सुमारे 40 हजार 300 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने 9 कंपन्यांशी सामंजस्य करार केला असून, हरित पोलादनिर्मितीच्या क्षेत्रातही महाराष्ट्राला देशाचे सर्वोत्तम राज्य बनवायचे आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईत ‘आयफा स्टीलेक्स 2025’ या स्टील महाकुंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी आणि विविध औद्योगिक कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आणि 9 कंपन्यांमध्ये 80 हजार 962 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे 40 हजार 300 रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या गुंतवणुकीमुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
2030 पर्यंत महाराष्ट्राच्या एकूण ऊर्जेतील 58 टक्के वीज ही अक्षय ऊर्जेतून येणार आहे. 2026 पर्यंत राज्यातील शेतकर्यांना पूर्णपणे सौरऊर्जेचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे वीज दरांवरील अनुदानाचा भार कमी होणार असून, उद्योगांसाठी वीज दर पुढील पाच वर्षे दरवर्षी कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यात आतापर्यंत सुमारे 81 हजार कोटींचे गुंतवणूक प्रकल्प पोलाद क्षेत्रात आले असून, महाराष्ट्र पोलाद उत्पादनात पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.