मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर आयोजित केलेली सभा उधळून गोंधळ घातल्याप्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने शिवसेना नेते अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई यांच्यासह 28 शिवसैनिकांना मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधिश राहूल रोकडे यांनी साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असण्याबरोबरच सबळ पुराव्याअभावी सर्वाची निर्दोश मुक्ताता केली.
18 वर्षांपूर्वी मतभेदामुळे नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना कार्यालयाबाहेर जाहीर सभा आयोजित केली होती. राणे यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिक हजर होते. शिवसैनिकांनी राणेंच्या सभेत गोंधळ घालण्याचा आणि ती सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते. याप्रकरणी शिवसेना नेत अरविंद सावंत,अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, सध्या शिंदे गटाचे सदा सरवणकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, यांच्यासह 29 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी वर्षभर सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुरू होती. या खटल्यात शिवसैनिकांच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. अनिल पार्टे, अॅड. गिरीश सावंत, अॅड. राहुल रोकडे यांनी बाजू मांडली. तर अॅड. मेराज शेख, अॅड. प्राची पार्टे यांनी खटल्यात सहकार्य केले. अखेर बुधवारी न्यायालयाने सर्व 28 शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.
अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, अजय चौधरी, दगडू सकपाळ, किरण पावसकर, सूर्यकांत महाडिक, श्रद्धा जाधव, हरीश वरळीकर, रवींद्र वायकर, विशाखा राऊत, सुहास पाटील, विनायक देवरुखकर, सदानंद परब, सूर्यकांत बिर्जे, अशोक केळकर, मनोहर सावंत, प्रवीण शेट्ये, मनोहर कांबळी, महेश सावंत, ज्योती भोसले, स्वाती शिंदे, इंदुमती माणगावकर, अजित कदम, स्नेहल जाधव, प्रिती देव्हारे, मंगेश भाटकर, प्रकाश पवार या 28 शिवसैनिकांना निर्दोष मुक्त करण्यात. आले तर शिवसेना नेत दत्तात्रय नलावडे यांचे खटला प्रलंबित असताना निधन झाल्याने त्यांचे नाव या खटल्यातून वगळण्यात आले.