मुंबई : ई-केवायसी प्रक्रियेत विचारलेल्या एका गोंधळाच्या प्रश्नामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 24 लाख महिलांना मासिक 1,500 रुपये मिळालेले नाहीत.
लाभार्थी महिलांची माहिती तपासण्यासाठी सरकारने ई-केवायसी सक्तीची केली होती. या प्रक्रियेत, ‘तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना,’ असा प्रश्न विचारण्यात आला. अनेक महिलांना तो नीट समजला नसल्याने चुकीचे उत्तर दिले गेले. या चुकीच्या उत्तरामुळे सरकारी यंत्रणेला असे वाटले की, संबंधित महिला किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत. नियमांनुसार सरकारी कर्मचार्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे 24 लाख लाभार्थी महिलांचे पैसे तत्काळ थांबवण्यात आले.
दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारने परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. आता अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचारी प्रत्यक्ष लाभार्थींच्या घरी जाऊन माहिती तपासणार आहेत. योग्य कागदपत्रे सादर झाल्यानंतर पात्र महिलांना पुन्हा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.